जळगाव प्रतिनिधी >> वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या मुदत ठेवी परत मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बीएचआरप्रमाणे खडसे यांनी त्यांच्या नावाने असलेल्या पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत करून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला खडसे पतसंस्थेतून मुदत ठेवी परत न मिळालेले भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील यादव जगन्नाथ पाटील व वरणगाव येथील प्रकाश रघुनाथ चौधरी उपस्थित होते. खडसे यांनी स्वत: या पतसंस्थेचे उद्घाटन केलेले आहे. ते स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही पतसंस्थेचे संचालक नाहीत. मात्र, त्यांचे नाव या पतसंस्थेला असल्याने विश्वासाने या पतसंस्थेत ठेवीदारांनी मुदत ठेवी ठेवल्या आहेत.
पाटील यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी दाम दुप्पट ठेव योजनेत ५० हजार रुपये ठेवले. त्याची रक्कम आता दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे. त्याचप्रमाणे २७ हजार रुपयांची दुसरी मुदत ठेव ठेवली होती. तिसरी पावती ३० हजार रुपयांची आहे. मात्र, या मुदत ठेवी परत मिळालेल्या नाही. संस्थेचे चेअरमन सुधीर कोल्हे हे मृत झालेले आहेत.
संचालक प्रवीण पाटील आता संस्थेचा कारभार बघतात. त्यांच्याकडे ठेवींबाबत विचारणा करूनही ठेवी परत मिळालेल्या नाहीत. खडसे यांनाही या ठेवी परत मिळण्यासाठी भेटलो असता त्या संस्थेला केवळ माझे नाव दिलेले आहे. तिच्याशी थेट काही संबंध नसल्याचे सांगितले.
प्रकाश चौधरी यांनी पत्नी आशाबाई चौधरी यांच्या नावे १० हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. ती परत मिळाली नाही. इतरही अनेक ठेवीदारांच्या या पतसंस्थेत ठेवी अडकलेल्या असल्याचे ठेवीदारांनी सांगितले. त्याचप्रमाणे धनवर्धिनी, महात्मा फुले अर्बन या पतसंस्थांमध्येही ठेवी अडकलेल्या आहेत. वरणगाव येथील संस्थेचे संचालक खडसे यांचे निकटवर्तीय असून, त्यांनी न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले.