जळगाव प्रतिनिधी >> १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करत बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवत महिलांना गंडविले असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वत्सला रमेश पाटील (वय-५९) रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण शर्मा व संजय जयनारायण शर्मा (सर्व रा.सांगवी, ता.शिरपुर, जि.धुळे) हे गेल्या १५ वर्षांपासून वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याच्या वास्तव्याला होते.
ओळखीचे असल्यामुळे जोशी परिवाराने वत्सला पाटील यांनी माहिती नसतांना सून कामिनी रामकृष्ण पाटील यांच्याकडून मेडीकल दुकानाचे साहित्य घेण्यासाठी १५ हजार रूपये घेतले. त्यानंतर संगिता जोशी हिने वत्सला पाटील यांच्याकडून ५ जुलै २०१९ रोजी ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर ७ डिसेंबर २०१९ रोजी अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट खासगी फायनान्स येथे तारण ठेवून ६४ हजार ३७५ रुपये संगीता जोशी हिने घेतले.
आमच्याकडे पेट्रोल पंप असून खूप पैसे आहेत, तुम्हाला रोख पैसे देऊ, असे सांगितले. त्यानंतर फेब्रवारी २०२० मध्ये जोशी परिवार घराला कुलुप लावून निघून गेले. यानंतर परिसरातील इतर महिलांना उद्योग देण्याच्या नावाखाली महिलांच्या नावावर वेगवेगळ्या फायनान्सकडून कर्ज काढून फसवणूक केली आहे.