धुळे ::> शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील पानटपरी चालकाने हप्ता दिला नाही म्हणून दोन जणांनी टपरी चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील करवंद नाका परिसरात दिलीप भगवान माळी यांची पानटपरी आहे. त्यांच्याकडे शहरातील चोपड्या उर्फ महेश श्रावण माळी व मुन्ना माळी हे महिन्याला दोन हजार रुपये हप्ता मागत होते.
हप्ता दिला नाही तर या भागात व्यवसाय करू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिलीप माळी यांना दिली होती; परंतु दिलीप माळी यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे त्याचा दोघांना राग आला.
दिलीप माळी १० सप्टेंबरला दुपारी जेवणासाठी घरी जात होते. त्यावेळी करवंद नाका सर्कल जवळ चोपड्या उर्फ महेश श्रावण माळी व मुन्ना माळी हे दोघे आले. त्यांनी दिलीप माळी यांना थांबवून हप्ता देत नाही व आम्हास घाबरत नाही, असे म्हणत मारहाण केली. त्यामुळे दिलीप माळी जखमी झाले.
या वेळी प्रवीण भगवान माळी, राजेंद्र पाटील, लालचंद पारधी आल्याने मारहाण करणारे दोन्ही जण दुचाकीवरून पळून गेले. घटनेनंतर दिलीप माळी यांना उपजिल्हा रुग्णालयात व तेथून धुळे येथे हलवण्यात आले होते.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात चोपड्या उर्फ महेश श्रावण माळी व मुन्ना माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.